Tuesday 3 January 2012

ऍटिट्यूड - Saamna Daily dtd: 01/012012

कॅनडामध्ये जन्मलेल्या जस्टीन हाइन्सला जन्मत:च ‘लारसन सिन्ड्रोम’ नावाचा असाध्य रोग आहे. त्यामुळे जस्टीन व्हीलचेअरला खिळून आहे. या रोगात शरीरातील सांधे निकामी होतात. त्याचे मोठे सांधे तर पूर्णत: निकामी आहेतच; पण मनगट, बोटे यामधले सांधेदेखील विचित्रपणे हलतात. व्हीलचेअर स्वयंचलित आहे म्हणून बरे नाही तर जस्टीन अंथरुणालाच खिळून राहिला असता. व्हीलचेअरद्वारा जस्टीन त्याचे सर्व व्यवहार करतो. सर्वत्र फिरतो. सर्वत्र म्हणजे अगदी सर्व जगभर फिरतो. कारण शरीर जरी अपंग असले तरी जस्टीनची ऍटिट्यूड अपंग नाही. ती नित्य नवी उंच भरारी घेत असते. जस्टीनची आई सांगत होती, ‘जस्टीनच्या जन्मानंतर डॉक्टरांनी जेव्हा मला त्याच्या असाध्य रोगाविषयी माहिती दिली तेव्हा मीच क्षणभर पॅरालाइझ झाले. त्याला कसे वाढवायचे हेच कळेना. मन, शरीर सुन्न होऊन गेले; पण मला जर कोणी आधार दिला असेल तर तो या मुलाच्या दिलखुलास हसण्याने. लहानपणीचे सगळे फोटो पहा. कुठच्याही फोटोत दुर्मुखलेला चेहेरा नाही. सगळ्यात त्याच्या चेहेर्‍यावर मनमोकळे हसू. जन्मत:च आनंदी वृत्ती घेऊन आलाय जस्टीन. त्याच्या उत्साहाने माझ्या निराशेला आशेत बदलवले. एकदा तो मला म्हणाला, ‘मॉम चालणे म्हणजे काय असते? कसं वाटतं चालताना?’ माझ्या डोळ्यांत टचकन पाणी आले. ते लपवून घशात अडकलेला आवंढा गिळत मी चेहेर्‍यावर उसने हसू आणले व म्हटले, चल मी तुला चालवते. मी त्याला माझ्या पावलावर उभे केले, त्याचे दोन्ही हात माझ्या हातात घेतले व माझ्या पायावरूनच त्याला हळूहळू चालवले. जेव्हा त्याला खाली उतरवले तेव्हा तो म्हणाला ‘हँ, काहीसुद्धा मजा आली नाही चालायची. उलट कष्ट. I think walking is overrated. व्हीलचेअरमध्येच मजा आहे. I am happy with my wheelchair’. त्या दिवसापासून त्याने कधीही मला का चालता येत नाही हा प्रश्‍न केला नाही. लहानपणापासूनच जस्टीन सुरात गुणगुणायचा. बोलायच्या आधी तो गायला, शिकला. वडिलाच्या ज्यूकबॉक्सवर गाणी ऐकत तो तासन्तास घालवायचा व तसे गाणे स्वत: म्हणायचा प्रयत्न करायचा. त्याची आजी त्याला चर्चमध्ये नियमितपणे घेऊन जायची व सर्वांसमोर गायला लावायची. त्यामुळे त्याची अपंग अवस्थेत लोकांसमोर जायची,गायची, बोलायची भीती गायब झाली. १४ वर्षांचा असताना त्याने एक रेडिओ स्पर्धा जिंकली व त्याला टोरांटोच्या टीमच्या एका खेळाला प्रेक्षकांसमोर गायची संधी मिळाली. त्याने त्या संधीचे सोने केले. लोकांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरात त्याचे कौतुक केले. अफाट जनसमुदायाचा उत्स्फूर्त प्रतिसाद ऐकून तो इतका आनंदला की त्या दिवसापासून त्याने गाणे हेच आपल्या आयुष्याचे लक्ष्य केले. आता तो स्वत:ची गाणी स्वत: लिहितो, त्याला चाली लावतो. त्याचे दोन गाण्यांचे अल्बमही निघाले आहेत. त्याच्या दुसर्‍या अल्बममधले "Say What you will. हे गाणे केवळ दोन महिन्यांत इतके लोकप्रिय झाले की त्यामुळे जस्टीन सर्व जगात पोहोचला. मागच्या वर्षी त्याने अपंग लोकांच्या शर्यतीत भाग घेतला व जणू त्याला त्याचे जीवनध्येय मिळाले. त्याने त्याचे गाणे व आयुष्य अपंग लोकांसाठी निधी गोळा करण्यासाठी उपयोगात आणायचे ठरवले आहे. चीन, अमेरिका, अरब देश सगळीकडे जस्टीन निधी गोळा करण्यासाठी गाणी म्हणत फिरतो. त्याच्या गाण्यामुळे त्याला त्याच्या आयुष्याची दिशा तर सापडलीच, पण प्रेमिकाही मिळाली. अपंग माणसाला प्रेमिका असा प्रश्‍न कोणाच्याही मनात येणे साहजिक आहे. पण ती त्याच्या बाह्य रूपावर नाही तर त्याच्या हृदय पिळवटून टाकणार्‍या गीतलेखनावर फिदा आहे. तिच्या लेखी तो इतका मोठा आहे की त्याचे अपंगत्व ही फारच क्षुल्लक बाब आहे. ती जस्टीनबरोबर त्याची सावली बनून जगप्रवास करते. त्याची व्हीलचेअर उचलून गाडीत ठेवते, त्याला व्हीलचेअरवरून फिरवते. कष्टाचे तिला काही वाटत नाही कारण त्या कष्टाच्या मोबदल्यात तिला तिच्या प्रियकराचे गाणे जवळून ऐकता येते. प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या लोकांचा प्रतिसाद अनुभवता येतो. जस्टीनला लोक विचारतात की, इतक्या व्याधी असताना तो कसा नॉर्मल माणसासारखा जगू शकतो. जस्टीन म्हणतो की, ‘मी जन्मलो तोच हा असा. त्यामुळे मला दुसरे जीणेच माहीत नाही. माझ्या शारीरिक दोषांकडे लोकाचे लक्ष जाणे स्वाभाविक आहे म्हणूनच मी माझे गाणे जर इतक्या ताकदीचे बनवतो की लोकांचे लक्ष माझ्यावरून उडून जाऊन गाण्यात अडकावे. काय कमालीची ऍटिट्यूड आहे ना! सतत पॉझिटिव्ह विचार करणे, आपल्यातल्या फक्त उणिवाकडे बघून खंत न करणे, निराश न होता स्वत:तल्या चांगल्या गोष्टी शोधणे, शरीर साथ देत नसले तरी मनाच्या भरारीने स्वत:चे दैव बदलणे ही विजेत्याची लक्षणे आहेत. जगात जस्टीनसारखे अनेक विजेते आहेत ज्यांनी केवळ पॉझिटिव्ह ऍटिट्यूडने आपल्या शारीरिक, मानसिक, सामजिक कमतरतेवर मात केली आहे. संख्याशास्त्रानुसार इंग्रजी भाषेतल्या प्रत्येक अक्षराला एक विशिष्ट नंबर असतो. उदाहरणार्थ १ या नंबराची अक्षरे आहेत , A, J, दोन या क्रमांकाची अक्षरे आहेत B, K, T, तीनची C L U वगैरे वगैरे. त्याप्रमाणे ATTITUDE या शब्दातल्या अक्षरांची जर बेरीज केली तर ती १०० येते. नव्या वर्षात जाताना या १०० नंबरी शब्दाची गरज आहे. अशी ऍटिट्यूड की जिच्यामुळे आपण स्वत:चे व दुसर्‍याचे जीणे सुखद करू शकू, स्वत:हून स्वत:वर लादलेल्या कक्षा ओलांडू शकू. Wish you a very Happy, Healthy & Positive New Year.

Saturday 27 August 2011

जाहिरातीत राहून गेलेली मालिका - http://www.saamana.com/ dtd: 28/08/2011

जाहिरातीत राहून गेलेली मालिका
हा काहीच न कळण्याचा मोसम आहे असे दिसते. कलियुग संपून सुरू झालेल्या ‘सावळागोंधळ युगात’ सगळेच समजण्यापलीकडले वाटणे काही धक्का लागण्यासारखे नाहीच. ‘जो दिखता है वो बिकता है’ हा हल्लीचा नियम आहे. अर्ध्या तासाची मालिका पाहायला बसलात की 15 मिनिटे जाहिरातीतच जातात. मालिका चालावी म्हणून जाहिरात की जाहिरात चालावी म्हणून मालिका आहेत हे गणित मात्र कळत नाही. आयुष्याचे तसेच काहीतरी होते. जाहिरातींच्या गाजावाजात मनाला भिडणार्‍या मालिकांकडे दुर्लक्ष होते. अशीच एक मालिका म्हणजे इरोम चानू शर्मिला.
14 मार्च 1972 रोजी कोंगपाल कोंगखाम लेकार्ड, पोरोमपस, इंफाळ येथे तिचा जन्म झाला. श्री. इरोम नंदा आणि इरोम सखी यांची ही कन्या. आठ भावंडांमध्ये शर्मिला नेहमीच उठून दिसायची. जनावरांवर प्रचंड प्रेम करणे आणि आपली सायकल फिरवत गावातील सर्वांना भेटणे हाच तिचा छंद होता. संपूर्ण गावाची लाडकी शर्मिला सतत सर्वांना मदत करीत असे. प्रत्येकाशी प्रेमाने बोलून समजून वागणे या तिच्या स्वभावामुळे ती सगळ्यांनाच आवडत असे. ती 12 वर्षांची असताना तिचे वडील गेले. 1997 मध्ये तिच्या मोठ्या भावाचेही निधन झाले. खूप शिक्षण घ्यायची इच्छा असूनही परिस्थितीमुळे तसे जमले नाही. पण वाईट परिस्थितीने तिला तिच्या ध्येयापासून कधीच दूर केले नाही.
विचारवंत शर्मिलाने नेहमी सत्य व न्यायाचा मार्ग धरायचा हे मनाशी ठरवले होते. तिचे तत्त्वज्ञान व विचार वेळेबरोबर अधिक मजबूत व धारदार होत गेले. शिक्षण बारावीपर्यंतच करता आले, पण देशातील घडामोडी, साहित्य, मोठी व्यक्तिमत्त्वे यांचा अभ्यास तिने कधीच सोडला नाही. बातम्या पाहून तिचे मन नेहमीच तुटायचे. राजकारण आणि सामान्य नागरिकांची गळचेपी हा तिच्या जीवनातील अस्वस्थतेचे कारण ठरणारा मुद्दा आहे. हत्याकांड, मारहाण, अन्याय, मानवाधिकारांचे उल्लंघन हे सगळं का होतं असे तिने अनेकदा स्वत:लाच विचारले. गावातील थोरांशी चर्चा करताना ती आपल्या शंका त्यांच्यासमोर ठेवायची, पण उत्तरे कुणीच देऊ शकत नव्हते.
जस्टीस सुरेश यांच्या ‘पीपल्स ट्रिब्युनल’मध्ये तिचा सहभाग होता. हिंदुस्थानी सेनेतील एका जवानाने गावातील एका युवतीवर बलात्कार केल्याचे ऐकून तिचे हृदय थरारून निघाले. बरेच दिवस ‘ट्रिब्युनल’च्या या चर्चेत ती हरवलेली असायची. तिचे कशातही लक्ष लागत नव्हते अन्यायाविरोधात आपण का नाही लढत या विचाराने ती स्वत:ला छळत होती. ऑक्टोबर 2000 पासून तिचे विचारमंथन सुरूच होते. तेवढ्यात 2 नोव्हेंबर रोजी मालोम येथे तुलीहत्म विमानतळावर सुरक्षा दलाकडून 10 लोकांची हत्या करण्यात आली. शर्मिला आपली सायकल चालवत घटनास्थळी पोहोचली. त्या घटनेची ती प्रत्यक्षदर्शी आहे. सुरक्षा दलाने केलेल्या मानवाधिकाराच्या उल्लंघनाच्या निषेधार्थ तिने 2 नोव्हेंबर 2000 पासूनच उपोषण सुरू केले आहे. सुरक्षा बल विशेषाधिकार कायदा (एएफएसपीए) रद्द करावा अशी शर्मिलाची मागणी आहे. हा कायदा कोणतीही कायदेशीर कारवाई न करताच सुरक्षा बलांना गोळी मारण्याचे अधिकार प्रदान करतो.
लहानपणापासूनच ती गुरुवारचे उपोषण करायची. जगात अनेकांना जेवण मिळत नाही. मीही आठवड्यातून एक दिवस जेवणार नाही. हे तिने बरीच वर्षे पाळले. योगायोग असा की, 2 नोव्हेंबर 2000 सुद्धा गुरुवारच होता. उपोषण सुरू केल्यानंतर काही दिवसांतच शर्मिलाला अटक करण्यात आली. 5 नोव्हेंबर 2000 रोजी अटक झाली. कलम 306 म्हणजेच आत्महत्येच्या प्रयत्नांतर्गत तिला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. जोपर्यंत माझी मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत माझे उपोषण थांबणार नाही अशी घोषणा शर्मिलाने न्यायालयातही केली. तिचे उपोषण तोडण्याकरिता व तिला जिवंत ठेवण्याकरिता जबरदस्तीने जवाहरलाल नेहरू इस्पितळात ठेवले. अत्यंत हाल करून लसीद्वारे नळ्या लावून तिला अन्न देण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी केले. कलम 306 ची सहा महिने-वर्षभराची सजा संपली की शर्मिला परत सुटली. नव्याने उपोषण सुरू केले. परत पोलीस येतात. तिला पकडून नेतात आणि परत तेच तेच. शर्मिला सांगते, मला पकडून धरले जाते. मी काहीच नाही करू शकत. मला सुया टोचल्या जातात. नाकात नळ्या लावल्या जातात. या परिस्थितीत मी फक्त सहन करते. पोलिसांच्या तावडीत ती वाचन करते, कविता लिहिते, लेख लिहिते. आताच तिची हाडे ठिसूळ झाली आहेत. वजन कमी होत चालले आहे. 11 वर्षांचे हे उपोषण तिचे शरीर करीत आहे. ती सांगते मालोममधील दृश्य मला अजून खाते. सामान्य जनतेने झेललेल्या गोळ्या मला झोपू देत नाहीत. त्या मृतांमध्ये 18 वर्षांचा सिनम चंद्रमनी होता. त्याला 1988 मध्ये हिंदुस्थान सरकारकडून शौर्य पदक मिळाले होते. त्याला आपल्याच सुरक्षा दलांनी गोळ्या घालून मारले. तेही उगाच. मी हे नाही विसरू शकत. 2004 साली जस्टीस जीवन रेड्डी यांची कमिटी बसवली गेली. सरकारला त्या कमिटीने हा कायदा बदलावा असा सल्लादेखील दिला पण त्याचे पुढे काहीच झाले नाही. कायदा तसाच राहिला आणि शर्मिलाचे उपोषणही तसेच राहिले. आजही ती सामान्य माणसांच्या जगणे या अधिकारासाठी आपले आयुष्य त्यागून रोज संघर्ष करीत आहे.
उपोषण सुरू केले तेव्हा ती 28 वर्षांची होती. आज ती 39 वर्षांची आहे. तरीही सरकार झोपलेले आहे. बडे बडे तिला भेटून गेले व तिने उपोषण बंद करावे असे सांगूनही गेले, पण मदतीचा हात मात्र कुणाकडून आला नाही. तिचे आयुष्य आता जवाहरलाल नेहरू इस्पितळात नळ्या लावून सुटकेची वाट पाहणे आणि सुटल्यावर उपोषणावर जोर लावणे. सरकार जसे उठून बसले आहे, मीही तेच करणार असे ती ठामपणे सांगते. आज समाजसेवेलाही मार्केटिंग आणि पीआरची गरज आहे. ती कोणत्या राज्यकर्त्यांना ओळखत नाही. तिचा दिल्लीशी काहीच संबंध नाही. कुणी बाबा किंवा आध्यात्मिक गुरू तिला ओळखत नाही हेच तिचे दुर्दैव. नाही तर आज मणिपूरमध्येदेखील रामलीला मैदान भरले असते. आय. एम. शर्मिला अशा टोप्या कुणी छापल्या नाहीत आणि छापणारही नाही, पण शर्मिलाला त्याचे काहीच वाटत नाही. तसे पाहिले तर देशात जागोजागी रामलीला मैदान सजले पाहिजे. कुचकामी सरकार असले की अन्यायाशिवाय दुसरे काय मिळणार! आज संपूर्ण देश सरकारविरोधात भडकला आहे. प्रत्येकाला बदल हवा. जेवढे रस्त्यावर उतरले तेवढ्यांनी जरी मतदान केले तर बदल घडेल. शर्मिला एक सत्याशी आपली भेट घडवणारी एक मालिका आहे, ती जाहिरात नाही. तिचे पोस्टर नाही लागले. तिच्या जाहिराती टीव्हीवर नाही दिसल्या. मुळात देशाला शर्मिला कोण हेही नीट माहीत नाही. आपण फक्त जाहिरातीत गुंतलोय. जरा डोळे उघडा. टीव्हीवर जाहिराती पाहताना चुकून एखादी चांगली मालिकाही पाहा.
शर्मिलाच्या ‘गाजावाजा’विना चाललेल्या उपोषणाचे फळ तिला मिळो व तिच्या शौर्याची मालिका संपूर्ण जगात पसरो ही माझी इच्छा आहेे. पण एकमात्र आहे जाहिरातींनी मनोरंजन ‘सॉलिड’ होते.

Friday 8 April 2011

*स्मरण **'**फर्स्ट गिअर**'**चे !** *

त्या दिवशी गाडी चालवत होतो. मुंबईत गाडी चालवायची म्हणजे क्लच, ब्रेक
आणि गिअर बरोबर
झटापट ही आलीच. बदलत जाणारे गिअर्स आणि त्यामुळे बदलत जाणारा गाडीचा वेग यावरून
एक कल्पना सुचली.
गाडी सुरु झाल्यावर तिला पुढे नेण्यासाठी आपण 'फर्स्ट गिअर' टाकतो. हा 'फर्स्ट
गिअर' म्हणजे आपल्या जवळची सख्खी माणसं. आई-बाबा, जोडीदार, मुलं, जवळचे
मित्र...
हा पहिला गिअर टाकल्याशिवाय गाडी पुढे जात नाही. मुंगीच्या गतीने का होईना गाडी न
थांबता 'पुढे' जात राहिली पाहिजे हा पहिला 'संस्कार' फर्स्ट गिअर करतो.
इथे आपल्याला unconditional प्रेम मिळतं, सुरक्षितता मिळते. गाडी 'बंद पडणार
नाही' याची पुरेपूर काळजी हा फर्स्ट गिअर घेतो. परंतु गाडी 'पळण्यासाठी' इतका
कमी वेग पुरेसा नसतो.
आपण गाडीचा वेग वाढवतो. सेकंड गिअर टाकतो ! इथे आपल्याला घराबाहेरचं
विश्व कळू लागतं.
शाळा, कॉलेज, पुस्तकं, मिडिया, आपले छंद, विविध कला..... बाहेरचं जग किती मोठं
आहे आणि माहिती आणि ज्ञानामुळे हेच मोठं जग किती जवळ आलं आहे, हे कळतं.

समोर पसरलेला संधीचा आणि प्रगतीचा रस्ता आता आपल्याला खुणावू लागतो.

गाडीचा वेग आणखी
वाढवण्यासाठी आपण आता थर्ड गिअर टाकतो. गाडीचा वेग आणखी वाढतो. हा थर्ड गिअर
म्हणजे आपला नोकरी धंदा आणि त्यातून मिळणारं विना-खंडित उत्पन्न. गरजे पुरतं घर,
कपडा लत्ता, भांडीकुंडी, पहिला फ्रीज, पहिला टीव्ही, प्रसंगानुरूप
हॉटेलिंग, सणासुदीला
नवीन कपडे, चांगले मार्क मिळाले तर मुलाला/मुलीला सायकल वगैरे थर्ड गिअरमध्ये
येतं. या गिअरमध्ये आपण बऱ्यापैकी स्थिरावतो. गाडीचा वेग ना कमी ना जास्त. सेकंड
मधून थर्ड गिअर मध्ये आलो तेव्हा वेग जास्त होता हे मान्य, पण आता तोच वेग कमी
वाटू लागतो.

आपण आता 'फोर्थ गिअर' टाकतो. गाडी सुसाट निघते. मनात आलं की
हॉटेलिंग-शॉपिंग-मल्टीप्लेक्स, गाडी, latest मोबाईल, 1 BHK मधून 2 BHK, laptop,
ह्याउ नि त्याउ..!
या वेगाची नशाच काही और! गम्मत म्हणजे आपण पाचव्या गिअर मध्ये कधी जातो
हे आपल्यालाच
कळत नाही...आता गाडी अक्षरश: तरंगत जात असते. हजार... लाख... कोटी...
खर्व.... निखर्व......रुपये
नाहीत, गरजा! हा 'वेग' खूप आनंददायी असतो. आपल्या गाडीच्या आड कोणी येऊ नये, '
लाल' सिग्नल लागू नये असं मनोमन वाटत असतं....
आणि... आणि.....आणि...
... ‘नियती’ नावाचा एक स्पीडब्रेकर समोर येतो. तो खूप प्रचंड असतो.

गाडी थांबवण्यावाचून आता पर्याय नसतो. पाच.. चार.. तीन..दोन...एक....
खाट खाट गिअर मागे टाकत आपण आता neutral वर येतो. कचकावून ब्रेक लागतात.
गाडी पूर्ण
थांबते. आपल्या अंगाला खूप मोठा झटका बसतो.
पाचव्या गिअर मध्ये गाडी असताना आपण कधी काळी फर्स्ट गिअर देखील टाकला होता
याचा विसर पडला होता. वरचा प्रत्येक गिअर टाकताना त्या गिअरची अशी एक मानसिकता
होती...
आज एक एक गिअर मागे येताना हे पहिल्यांदा जाणवलं.

गाडी आता पूर्ण थांबली आहे. गाडी आता पुढे न्यायची आहे.. मला सांगा कुठला
गिअर टाकाल
?
सुसाट वेगाचा पाचवा गिअर ? की मुंगीच्या वेगाचा पण गाडी चालू ठेवेल असा 'फर्स्ट
गिअर' ?
आयुष्यात जेव्हा पराभवाचे, निराशेचे क्षण आले होते, तेव्हा कोण होतं तुमच्या
जवळ? कोणी दिला होता आधार ? आठवून पहा. प्लाज्मा टीव्हीने ? EMI भरत विकत
घेतलेल्या extra बेडरूमने? नव्या कोऱ्या गाडीने ? 'You are promoted' असं
लिहिलेल्या कागदाने ?

मी सांगतो कोण होतं तुमच्याजवळ. तुम्हाला आधार दिला होता फर्स्ट गिअरने !

आर्थिक अडचणीच्या वेळी आपल्या उशाखाली नोटांचं पुडकं हळूच ठेवून जाणारे
बाबा, निरागस
प्रश्न विचारून आपल्या चिंता घालवणारी आपली चिमुरडी मुलं, 'होईल सगळं व्यवस्थित'
म्हणत डोक्याला बाम चोळून देणारी 'बायको' नावाची मैत्रीण, बाहेरचं खाऊन त्रास
होऊ नये म्हणून पहाटे उठून पोळी भाजीचा डबा बनवणारी आई, 'त्या' काळात
आपल्याfrustration चा
‘कान’ होणारे आणि योग्य सल्ला देणारे जिवाभावाचे मित्र हे सगळे फर्स्ट गिअर
तुमची गाडी ओढत नव्हते का ?

Don't get me wrong. माझा चवथ्या-पाचव्या गिअर्सना आक्षेप नाही. त्या वेगाची धुंदी
जरूर अनुभवूया. त्याचा आनंदही उपभोगुया. फक्त त्यावेळी आपल्या 'फर्स्ट गिअर्स' चं
स्मरण ठेवूया.

आयुष्याचा वेग मधून मधून थोssडा कमी करत पुन्हा एकदा फर्स्ट गिअरवर येऊया.


सुसाट वेगाचा 'arrogance' इथे नाही... गाडी थोडी हळू चालेल हे मान्य. 'फर्स्ट
गिअरचं' अस्तित्व लक्षात घ्यावंच लागेल असा हा वेग असेल.

त्या निवांतपणाशी थोडं खेळूया आणि मग टाकूया पुढचा गिअर !


जाता जाता आणखी एक.
स्वत:लाच एक प्रश्न विचारूया - दुसऱ्या कुणाच्या आयुष्याचा मी बनू शकेन का ‘फर्स्ट
गिअर’ ?

Monday 15 November 2010

मी.

आज खरंच असं वाटलं की मी काय करतोय???
मला हेच करायचं होतं का?? किंवा करायचं आहे का?

म्हणायला गेलं तर खुपच साधा प्रश्न, आणि म्हणायला गेलं तर खुपच अवघड सुद्धा.
गंमत म्हणजे, काल परवा पर्यंत असं वाटत देखील नव्हतं नेमकं काय चाललय माझ्या आयुष्यात, मस्तपैकी नौकरी आहे, पोटापुरतं मिळतंय, म्हंजे एकुण सुखात चाललय. पण मग अधुन मधुन हे असं अस्वस्थं का वाटायला लागलंय मला?. कधी कधी ते संदीप - सलील चं गाणं "आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो, चाकोरिने खरडुन कागद सहीस पाठवीतो.... " मला माझ्याबद्दलच लिहीले आहे असंच वाटायला लागतं. पण खरचं सांगायच तर सध्याच्या आयुष्याबद्दल तक्रार करण्यासारखं काहीच नाहीये पण तरीहि हे असं का वाटतय त्याचा काही पत्ता लागत नाहीये.????

Wednesday 26 May 2010

दृष्टीकोन....

एक अति श्रीमंत पिता आपल्या मुलाला एका खेड्यात घेऊन गेला।लोक किती गरिबीत जीवन जगतात हे मुलाला दाखवण्याचा त्याचा उद्देश होता.
एका गरीब कुटुंबात शेतातील घरात दोन दिवस ते राहिले.
आपल्या घरी परततांना त्यने मुलाला विचारले ,
' कशी झाली ट्रिप ? '
' फारच छान डॅड '
' गरीब लोक कसं जीवन जगतात बघितलंस ना? '
' हो ' मुलगा म्हणाला.

' हं आता मला सांग हे बघितल्यानंतर तू काय शिकलास ?' वडीलांनी विचारलं
मुलगा म्हणाला '' मी बघितलं आपल्याजवळ एक कुत्रा आहे तर त्यांच्याजवळ चार .''
आपल्या बागेच्या मध्यभागी एक तळं आहे तर त्यांच्याजवळ खाडी आहे की जिला अंत नाही.

आपल्या बागेत इंपोर्टेड दिवे आहेत तर त्यांच्याजवळ रात्रभर लुकलुकणारे तारे आहेत.

आपल्या बागेची सीमा कुंपणापर्यंत संपते त्यांच्यासाठी तर अवघं आकाश खुलं आहे.

राहण्यासाठी आपल्याकडे जमिनीचा लहानसा तुकडा आहे. तर नजर पोहोचणार नाही तिथपर्यंत त्यांची शेतं आहेत.

आपल्याकडे नोकर आहेत आपली सेवा करण्यासाठी आणि ते दुसर्‍यांची सेवा करतात.

आपले अन्न आपण विकत घेतो आणि ते स्वत: चं अन्न स्वत: पिकवतात.

संपत्तीचं रक्षण करण्यासाठी त्याभोवती आपण कुंपण बांधले आहे. रक्षणासाठी त्यांचे मित्र धावून येतात.

वडील स्तब्ध झाले.
मुलगा पुढे म्हणाला , '' आपण किती गरिब आहोत ते मला दाखवल्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे.

Saturday 15 May 2010

सलिल कुलकर्णीचा एक अप्रतिम लेख

संगीतकार म्हणून सूर-तालाशी खेळताना, गायक म्हणून शब्द-सूर आळवताना रसिकांशी सुरेल नातं जुळत जातं. बघता बघता ते अबोल नातं बोलकं होतं आणि मग गप्पांची मैफल जमवायची इच्छा अनिवार होते.. दर १५ दिवसांनी ही सुरेल मैफल अनुभवता येईल.
‘हॅलो सर, मी बर्लिनहून बोलतोय! सर मी २८ वर्षांचा आहे आणि माझे आई-वडील ठाण्यात असतात. बाबा म्हणतायेत तू शिक अजून. ते कर्ज काढतायेत, पण मला वाटतंय आता बस्स! मी पीएच.डी. झालोय..’ नावसुद्धा न सांगता हा मुलगा ऊर फोडून बोलत होता. माझ्या तोंडून फक्त.. हं.. हं..! ‘मी परत ठाण्याला चाललोय, बाबांना सांगणार आहे, तुम्ही रिटायर व्हा! माझे बाबा खरंच दमलेत हो.. गेले काही दिवस मी खूप दिवस अस्वस्थ होतो, पण काय करावं सुचत नव्हतं. इंटरनेटवर ‘दमलेला बाबा’ गाणं ऐकलं आणि परतीचं तिकीट काढलं.’ आता माझ्या तोंडून ‘हं.. हं’ सुद्धा जात नव्हतं, इतका सुन्न झालो मी. एक उच्चशिक्षित तरुण इतका हळवा होऊन छोटय़ा मुलासारखा रडत होता.. बाऽऽऽऽप रे! हे काय आहे? दाद ? चांगल्या गाण्याला प्रतिसाद़़? की रसिकता़़़, हळवेपणा, खरेपणा.. खूप विचार केला आणि उत्तर सापडलं ते एवढंच, की ‘याला म्हणतात नातं.
‘दूर देशी गेला बाबा, गेली कामावर आई..
नीज दाटली डोळ्यांत.. तरी घरी कुणी नाही..’
हे आमचं गाणं ऐकून एक भगिनी रंगात येऊन रसग्रहण करीत होत्या- ‘आजचे आई-बाबा स्वत:मध्येच इतके व्यस्त असतात की, मुलांसाठी वेळ आहे कोणाला? आजची मुलं फार एकटी झाली आहेत. त्यांची व्यथा.. वगैरे वगैरे.. त्या कौतुक करत होत्या. पण ते ऐकताना डोक्यात इतका कल्लोळ झाला की, वाटलं, आम्ही नाही हो इतके वाईट, नाही हो इतके स्वार्थी.. हतबल आहोत आम्ही! ..डोळ्यासमोरून एखादा चित्रपट जावा तसे मी पाहिलेले सगळे व्यग्र ‘बाबा’ सरकत होते..
खूप आधी ठरवूनसुद्धा आयत्या वेळेला बॉसनी महत्त्वाचं काम लावलं, म्हणून मुलाच्या गॅदरिंगला जाऊ न शकलेला ‘बाबा..’, त्याच गॅदरिंगमधलं मुलाचं गाणं फोनवरून ऐकून गाडीत एकटाच टाळ्या वाजविणारा ‘बाबा’, परदेशातून येताना मुलीने फर्माईश केलेली बार्बी डॉल घेऊन वाढदिवसाच्या दिवशी पोहोचण्याचा आटापिटा करताना विमान रद्द झाले, म्हणून रात्री उशिरा पोहोचल्यावर मुलीच्या उशाशी बाहुली ठेवून झोपलेल्या त्या मुलीकडे पाहत आपले अश्रू इतरांपासून लपवणारा ‘बाबा..’, नाटकाच्या दौऱ्यावर असताना दर चार तासांनी आपल्या बायकोला फोन करून सहा महिन्याच्या बाळाच्या कानाला फोन लावायला सांगून ‘हॅलो हॅलो. मी बाऽबा’ म्हणत आपला सहवास देऊ पाहणारा अस्वस्थ ‘बाबा’, घरापासून दूर सहा-सहा महिने बोटीवर, युद्धभूमीवर राहणारा आणि पत्रातून, फोनमधून ‘माझी आठवण काढतात ना मुलं? मी आठवतो ना त्यांना? अशा प्रश्नांना बायकोच्या ‘हो..’ या उत्तरासाठी आसुसलेला ‘बाबा’.. इथपासून ते मुलीचं लग्न ठरल्यापासून रोज ‘बोलता बोलता ठसका लागला म्हणून डोळ्यात पाणी आलं, बाकी काही नाही..’ असं म्हणणारा ‘बाबा’!
बाळाकडे पाहून वेडा होऊन नाचणारा ‘बाबा’, ऑफिसमध्ये अतिशय कडक असलेला, पण घरी शाळा-शाळा खेळताना मुलीच्या हातचा धपाटा आनंदाने खाणारा ‘बाबा’, रात्री उशिरा घरी आल्यावर मुलांच्या केसातून हात फिरवत एकटाच बोलणारा ‘बाबा’, मुलांबरोबर फटाके उडवताना पुन्हा एकदा लहान होणारा ‘बाबा’, कामानिमित्त घरापासून दूर राहूनही दर रविवारी काही तासांसाठी धडपडत घरी येऊन मुलांना डोळे भरून बघणारा बाबा, शिकायला परदेशात गेलेल्या मुलीशी वेब-कॅमवर गप्पा मारताना ‘तू बारीक का वाटतेस गं? तिकडे खूप त्रास होतोय का?’ म्हणत ‘नाही तर सरळ परत ये भारतात’ असं सुचवणारा बाबा..
या सगळ्या बाबांची ‘हाक’, त्यांची धडपड, करिअर, पैसा हे सारे सांभाळत मुलांबरोबर वेळ घालविण्यासाठी ते करीत असलेला आटापिटा- हे सगळं सांगावसं वाटलं!
अशा प्रत्येक पुरुषाला ही बोच असते. जेव्हा मित्र एकत्र जमतात, तेव्हा एकमेकांना खूप मनापासून सांगतात की, ‘थोडा आराम कर, मुलांबरोबर मजा कर’ कळतं, पण साधायचं कधी? कसं? ते कळत नाही. या गर्दीत धावताना आपलं जगणं कुठे आपल्या हातात राह्यलंय?
माझा मुलगा मला जसं म्हणाला की, खूप गमती आहेत माझ्याकडे, आता नको पैसे, तू घरी थांब.’ ..कुठे थांबायचं हे मुलं सुचवतात, पण आपल्यालाच समजत नाही. धावत राहतो आपण. आणि मनात ही भीतीही बाळगतो की, उद्या मुलं मोठी झाल्यावर गरज असेल त्यांना आपली?
अस्वस्थ मनानं हे सगळं संदीप खरेशी बोललो. त्याचं आणि माझं नातं म्हणजे -
न सांगता तू मला उमगते सारे
कळतात तुलाही मौनातील इशारे
दोघांत कशाला मग शब्दांचे बंध
कळ्यांचा चाले कळ्यांशी संवाद.
असं आहे. त्यालाही हे सारे असंच, इतकंच तीव्रतेने वाटत होतं आणि त्याच्यातला हळव्या मनापासून कविता लिहिली. माझ्या अस्वस्थ अवस्थेतच चाल तयार झाली होती. दु:खापेक्षाही उद्विग्नता, फ्रस्ट्रेशन मांडणारी ही चाल आणि ते शब्द यांतून हे गाणं रसिकांच्या मनात खूप खोलवर रूजलं.
प्रत्येक ठिकाणी वेगळे किस्से, वेगळ्या प्रतिक्रिया.. कार्यक्रमात छोटी-छोटी मुलं-मुली आपल्या बाबांना रडताना पाहून सुन्न झाली. कोणी ‘माझ्या बाबाला का रडवलंस’ म्हणून आमच्यावर चिडली. सासरी गेलेल्या मुलींनी ‘बाबा गाणं ऐकलंत?' म्हणत फोन केले. सगळ्यांच्या प्रतिक्रिया तुटक्या, हळव्या आणि दुखऱ्या..
हे गाणं मुलांनी बाबांसाठी ऐकलं आणि बाबांनी मुलांसाठी, आणि बाबांच्या बाबांसाठीही. हे गाणं जितकं बाबाचं, तितकंच ते आजच्या नोकरी-व्यवसाय करणाऱ्या आईचंसुद्धा..
प्रत्येक ठिकाणी गाण्यावर वेगळे किस्से, वेगळी प्रतिक्रिया.. सगळ्या तितक्याच हळव्या, दुखऱ्या.. (इथे वाढू शकतं!!)
आम्हीही घरापासून दूर-दूर पुन: पुन्हा हे गाणं गातो आणि जखम रोज भळभळते. रोज ठरवितो की, या महिन्यात थोडं नीट नियोजन करायचं. मुलांबरोबर करायच्या अनेक गोष्टी घोळतात, पण बघता बघता हा महिना सरकतो.. मग स्वत:लाच पुढच्या महिन्याचं वचन.. हे चुकतंय, ते समजतं, पटतं. जे ठरवतो, ते हातून घडत नाही, यासारखी दुसरी बोच नाही. थोडं थांबायला हवंय. वेग कमी करायला हवाय..
पण निदान हे जमेपर्यंत तरी स्वत:ला टोचून टोचून रोज गायलाच हवं..
‘असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून
असा कसा बाबा देव लेकराला देतो?
लवकर जातो आणि उशिरानं येतो..
सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची या कहाणी तुला..’

Thursday 25 March 2010

आयपीएल, पुणे टीम आणि पुणेरी पाट्या ...

शेवटी येणार येणार म्हणता पुण्याची 'आय पी एल टीम' आली.
आता आम्ही वाट पहातो आहे ती टीमच्या नावाची आणि त्यातल्या खेळाडुंची.
ते येईल तेव्हा येईल पण एक (भविष्यातले) पुणेकर ह्या नात्याने आम्ही काही "पुणेरी पाट्या" लागोलाग तयार करुन ठेवत आहोत, पुढे त्याची अर्थातच गरज पडेल ह्याविषयी आमच्या मनात अजिबात संदेह नाही.

* ह्या पाट्या आहेत त्या 'मैदानावरच्या' .....
१. सामन्याची वेळ तुमच्या तिकिटावर छापलेली आहे, उगाच कधीही येऊन गर्दी करु नये.
२. सामन्याच्या वेळेच्या आधी ३० मिनिटे मैदानात प्रवेश दिला जाईल, तुम्ही गडबड केल्याने सामना लवकर सुरु होणार नाही.
३. खुर्चीचा वापर फक्त बसण्यासाठीच करावा ... एका खुर्चीवर एकच !
४. मैदानात पिण्यासाठी (साध्या) पाण्याची व्यवस्था केली आहे, थंड तसेच फिल्टर्ड पाणी आपण दिलेल्या तिकिटाच्या पैशात मिळणार नाही, उगाचच आयोजकांकडे हट्ट धरु नये.
५. मैदानावरचे कॅमेरे हे सामन्याच्या हालचाली टिपण्यासाठी आहेत, उगाच हिडीस चाळे करुन त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करु नये.
६. आपण पुण्यासारख्या एका सुसंस्कृत शहरात एका सार्वजनिक ठिकाणी सामना पहात आहोत ह्याचे भान ठेऊन चियरलिडर्सना खाणाखुणा करु नये किंवा त्यांच्याकडे डोळे फाडुन बघुन लाज आणु नये. अश्लील चाळे कराल तर नुसतीच पोलीस कारवाई नाही तर धिंड काढण्यात येईल.
७. फुंके ( सिगारेट, बिड्या, चिलीम ), थुंके ( तंबाखु, गुटका, मावा, पान ) आणि शिंके ( तपकीर आणि स्वाईन फ्ल्युग्रस्त ) ह्यांना मैदानात मज्जाव.
८. मैदानात दारु विक्री केली जात नाही, मैदानात दारु पिऊ दिली जात नाही, मैदानात बाहेरुन दारु पिऊन आल्यास प्रवेश मिळणार नाही.
९. मैदानात विकत मिळणार्‍या खाद्यपदार्थांची आवरणे, पिशव्या तसेच पाणी किंवा शितपेयाच्या बाटल्या मैदानात फेकु नयेत, बाटलीवरुन खेळाडु घसरुन पडुन जखमी होऊ शकतो ह्याची किमान जाण ठेवावी.
१०. सामन्याच्या वेळी खेळाडुंना पाठिंबा देताना हळु आवाजात आरडाओरड करावी. हा क्रिकेटचा सामना आहे, तमाशाचा फड नव्हे !
११. अनोळखी वस्तुंना स्पर्श करु नये ... व्यक्तींसह !
१२. मैदानातील मोठ्ठे पंखे फक्त दुपारी आणि गर्दी असलेल्या ठिकाणीच लावण्यात येतील. पंख्याखाली बसण्यासाठी मोठ्ठ्या आवाजात भांडण करुन आयोजकांना त्रास देऊ नये.
१३. स्त्रियांचे स्वच्छतागॄह, खेळाडूंचे पॅव्हेलियन, चियरलिडर्स पोडियम, व्हीआयपी गॅलरी, पत्रकार कक्ष इत्यादी ठिकाणी उगाच जास्त घुटमळु नये.
14. सामन्यातील कसल्याही घटनेचा ( सामना हरणे, षटकार मारणे, धावबाद होणे, झेल टाकुन देणे वगैरे ) राग खुर्च्यांवर काढु नये.
15. सामना पहायला आलेल्या प्रेक्षकांचे खेडाळु, चियरलिडर्स, व्हीआयपी यांच्याबरोबर अथवा खेळपट्टी, पत्रकारकक्ष, समालोचन खोली, पॅव्हेलियन, व्हीआयपे बॉक्स इथे 'फोटु काढुन मिळणार नाहीत' किंवा त्याला परवानगी दिली जाणार नाही.
16. सामन्याच्या वेळेदरम्यान तुटलेल्या चपला, कापलेले खिसे, मोडलेला चष्मा, हरवलेली पर्स, गायब झालेला मोबाईल ह्यांची जबाबदारी आयोजकांकडे राहणार नाही. समोरच पोलीस स्टेशन आहे, तिकडे जाऊन तक्रार करावी.
17. हे पुणं आहे, शिमला नव्हे, उन्हाळ्यात गरम होणारच, पण म्हणुन मैदानात सामना पहायला शर्ट काढुन बसु नव्हे. अशा निर्लज्ज प्रेक्षकांना बाहेर काढले जाईल.
18. पाऊस पडल्यास पैसे परत मिळणार नाहीत, कॄपया हवामानखात्याशी सल्लामसलत करुन मगच तिकिट काढावे.
19. परदेशी खेळाडुंच्या अंगचटीला जाऊ नये तसेच त्यांना स्थानिक भाषेत गलिच्छ आणि अश्लील शिव्या देऊन वेडावुन दाखवु नयेत. ते आपले अतिथी आहेत, आपण घरात पाहुण्यांशी असे वागतो का ?
20. राजकीय नेते, सरकारी अधिकारी, स्थानिक दादा ह्यांचा वशिला लाऊन फुकट पास मागु नये. परवडत नसल्यास झाडावर चढुन सामना पहावा.
21. वरील सुचना ह्या चेष्टेचा विषय नव्हे ह्याची नोंद घ्यावी, ह्याची चेष्टा करणार्‍या प्रेक्षकांना संपुर्ण सामना संपोस्तोवर अंधार्‍या खोलीत बळजबरीने बसवुन ठेवले जाईल.

* ह्या पाट्या आहेत त्या ' आयपीएल-पुणे संघाच्या कार्यालयातल्या" ....
१. फक्त दिवसाचे सामने खेळले जातील, त्यातही दुपारी १-३ असा विश्रांतीचा वेळ राखुन ठेवावा लागेल.
२. रात्रीच्या सामन्याचा चार्ज वेगळा पडेल, कुठल्याही परिस्थीत रात्री ८ वाजता सामना संपवण्याची जबाबदारी आयोजकांची राहिल, सवड मिळाल्यास उरलेला सामना दुसर्‍या दिवशी खेळता येईल.
३. सोमवारी सुट्टी घेतली जाईल.
4. सर्व लोकांना जाहीर निवेदन देण्यात येते की "आयपीएल-पुणे संघ ( पुण्याचा अभिमान, महाराष्ट्राची शान ) " ही आमचा पुर्णपणे स्वतंत्र संघ असुन "मुंबई इंडियन्स, महाराष्ट्र" ह्या संघाशी आमचा कसलाही संबंध नाही. त्या संघाशी केलेल्या व्यवहाराची जबाबदारी केवळ तो मराठी आहे ह्या कारणाने घेतली जाणार नाही. तसेच त्या संघाच्याविषयी आमच्याकडे कसलीच चौकशी करु नये.
5. हा क्रिकेटचा संघ आहे. उगाच गाण्याच्या स्पर्धा, नाचकामाचे कार्यक्रम, पाणपोईचे उद्घाटन, नव्या दुकानाची चित्रफीत कापणे ह्या आणि अशाच इतर कामांसाठी खेळाडुंची चौकशी अथवा मागणी करु नये.
6. क्रिकेट हा एक खेळ आहे ह्याचे भान ठेवावे, आम्ही मॅचफिक्सींग करत नसल्याने जिंकण्याची कसलीच गॅरेंटी देता येणार नाही.
7. देणग्या मागणारे, गौरवनिधी सामने आयोजीत करणारे, सर्व्हे करणारे, फुकटात जाहीरातीसाठी कार्यक्रमाला हजरी लावण्याची विनंती करण्याची शिष्ठमंडळे आदी तत्सम व्यक्ती किंवा संस्था ह्यांना सक्त प्रवेश बंदी आहे, ह्यात कोणत्याही कारणास्तव बदल होणार नाही.
8. आमचे प्रतिस्पर्धी संघ कमी किमतीत खेळत असल्याच्या बढाया आमच्यासमोर मानु नये. आमचे इथे क्वालिटीला प्राधान्य असल्याने कमी किमतीत सामना खेळवण्याचा विचार केला जाणार नाही.
9. आपण आमच्या खेळाबद्दल समाधानी असताल तर इतरांना सांगा, नसताल तर योग्य आणि सभ्य शब्दात आम्हाला सांगा, योग्य दखल घेतली जाईल.
10. आमचेकडे शाळकरी संघांना ट्रेनिंग दिले जात नाही
11. आमच्याशी ठरलेल्या करारानुसार सामना झाल्यावर आमच्याकडुन सदिच्छा म्हणुन खेळाडुंचे टी-शर्ट्स, ट्रॅक सुट्स, टोप्या, बॅटी, चेंडु अथवा तत्सम कुठलेही किमती सामान भेट मिळणार नाही. उगाच हावरटपणा करु नये